असा अंतरी बहरतो गाव माझा.....


आंब्याची एक फोड चाखली आणि मन माझ्या गावाकडे धावलं. खरं तर मनाला खूप हूर हूर लागली होती. शिक्षणाच्या निमित्ताने लहानपणापासूनच काकांकडे रहायला होतो. फक्त उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी मिळायची गावाचा आस्वाद घेण्यासाठी. जाताना दिसणाऱ्या खुणा शोधताना खूप मजा यायची आणि त्या दिसल्यानंतर तेवढाच आनंदही व्हायचा. पोहोचल्यानंतर सारं काही तसच आहे ना हे बघण्यासाठी नजरेची धडपड असायची. आत्ताही वाटलं सगळं तसच असेल ना? डोळे बंद केले आणि अनुभवलं परत एकदा त्याला जसं च्या तसं. मोठ्ठा श्वास घेतला आणि खरच जाणवला की, अंगणातल्या ओल्या मातीचा सुगंध. तिथला वारा, तिथला पाऊस सगळं स्पर्शून गेलं मनाला अगदी खोल पर्यंत. अचानक माझी सावली हात सोडून धावली त्याला नजरेत साठवायला. मी हसले आणि घेत राहिले त्याचा अनुभव.

पाण्याची दिसणारी टाकी जी घराच्या अगदी समोरच आहे ती इथूनच दिसायला लागली. तिच्यातून पडणारे पाणी आमच्यासाठी धबधब्यापेक्षा नक्कीच कमी नसायचं, आम्ही मनसोक्त खेळायचो त्या पाण्यात. टाकीवर बसणारी भूतं ह्याविषयी होणारी मजेशीर चर्चा तर अखंड चालू असायची. नजर सारखी टाकी कधी दिसतेय ह्यावरच असायची. ती एक गावाजवळ पोहोचल्याची खुण होती. टाकी दिसल्या नंतरचा अर्धा तास कधी संपेल असं व्हायचं नेहमी आणि, आत्ताही अगदी तसच वाटलं. जाताना नदी ओलांडून जावी लागणारी  वाट, शेतातल्या मंदिराचं दिसणारं शिखर, अशी एक-एक खुण मागे टाकत शेवटी वेशीजवळ पोहोचले. आता मात्र रहावेना, मन सैरभैर झाले. डाव्या हाताला मंदिरातील देवांचं दर्शन घेतलं आणि नजर घराकडे वळली आई दिसतेय का ह्यासाठी जीवाची नुसती तगमग चालली होती आणि, तसच झालं, गाडीचा आवाज ऐकून घाई-घाई दारात उठून आलेली आई आणि तिचा हसरा चेहरा लांबूनच दिसला आणि, मन हसलं. टुमदार अंगण जणू हात पसरून मला जवळ बोलवत होतं. अंगणात रेखाटलेली रांगोळी माझं हसून स्वागत करत होती. एका बाजूला माझ्याच हातानी रंगवलेलं तुळशी वृंदावन अगदी तसच नवीन कोरं वाटत होतं. त्याचे रंगही खुलले होते माझ्याबरोबर. ती डोलती तुळस अंगणाचं पावित्र्य वाढवत होती. लहानपणी विटांचं आणि लाल मातीचं बांधलेलं छोटंसं घर अगदी दिमाखात उभं होतं एका बाजूला. आजूबाजूने असलेली मोकळी जागा दाखवत होती माझंच बागडणं मला. जास्वंद, अबोली, जुई सगळी झाडं प्रेमळ नजरेनी माझ्याकडे बघत होती. पारिजातका ने तर अख्खं अंगणच कुशीत घेतलं होतं. पारिजातकाचं स्वतःचं आयुष्य फार नसलं तरी त्याचा सुवास आपलं सगळं आयुष्य व्यापू शकतो. केशरी देठ आणि पांढरेशुभ्र टपोरे फूल, आहाहा!! अगदी ओंजळीत फुलं वेचून घेतल्यासारखं वाटलं.

पायऱ्या चढून धावत धावत आई बाबांच्या कुशीत शिरले. आजूबाजूला बरेच चिल्ले-पिल्ले आधीच जमा झाले होते. तेंव्हा त्यांच्यातलीच एक वाटले मला मी. आत गेले आणि नजरेचा शोध सुरु झाला. छान चार खोल्याचं घर. स्वयपाक घरात गेले जातं, ऊखळ दिसलं आणि आईने करून ठेवलेल्या चटण्या, घरच्या कैरीचं लोणचं, ठेचा दिसला आणि पोटात अगदी कावळेच ओरडायला लागले. तिथून मागची एक खोली जिथे धान्य ठेवलेलं होतं, आणि पूर्ण खोलीभर आंब्याचाच सुगंध दरवळत होता. आडीत हात गेला आणि एक आंबा शोधून शोधून खायला घेतला. लहानपणी जेंव्हा सगळे जमायचे तेंव्हा सकाळ झाली की, मोठी बादली गच्च  भरून आडीतून आंबे काढले जायचे आणि सगळीकडून गोल करून कोण जास्ती आंबे खातंय अशी रोज पैज लागायची. ही खोली लापाछपी च्या वेळेस आमच्या चांगलीच उपयोगाला यायची. आंबा खात खात  तिथून निघाले गच्चीवर, अरुंद असा जिना चढत आणि त्याची नक्षीदार खिडकी न्याहळत मी गच्चीवर पोहोचले. खूप शांत वाटत होतं. ह्याच गच्चीवर रात्रीचे चांदणे मोजत, पळत्या चांदण्या शोधत, झोपायचो. रात्रभर खूप गप्पा रंगायच्या मग झोप ती कसली?  एखाद्या वेळेस पाऊस पडलाच मग तर काय, खूपच धांदल उडायची. एक थेंब अंगावर पडायचा अवकाश की, सगळेच जागे व्ह्यायचे. मग पळापळ, आपापलं पांघरून घेऊन खाली पळायचे. जिथे जागा मिळेल तिथे आडवे व्हायचे. सुट्टी असायची त्यामुळे चुलत, मामे, आत्ये सगळेच भाऊ बहिण असायचे. येताना एस टी चे पहिले मोठे बाकडे पूर्ण भरून जायचे. आल्यावर नुसता धिंगाणा. सकाळी उन्हं डोक्यावर आल्यावर उठणं, आईचं अंघोळीसाठी मागे लागणं, मग, तू कर तू कर असं एकमेकांवर ढकलणं, आणि दिवसभर मनसोक्त खेळणं. जवळ जवळ अंगणातच आमचा अख्खा दिवस जायचा. लपाछपी, शिरा-पुरी, विटी-दांडू, डब्बा एक्स्प्रेस, विषामृत असे कितीतरी खेळ दिवस दिवस चालू राहायचे आणि अंगण अगदी खुलून जायचं. अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा काल खेळत असलेल्या खेळाचेच राज्य कोणावर तरी आलेले, तिथूनच सुरुवात व्हायची. दिवस कसे भर भर संपायचे. गच्चीशी खूप बोलका संवाद झाला आणि आईने हाक मारली.

मागच्याच अंगणात असलेल्या चुलीवर आईने मस्तसा घरच्या नुसत्या दुधाचा चहा केला. चुलीवरच्या स्वयपाकाची चव खरच कशालाच येऊ शकत नाही. लहानपणी आईच्या स्वयपाकाच्या नादात माझी लुडबुड पोळ्या लाटायला असायचीच. आई पण एक शेवटची पोळी करायला द्यायची आणि ती छान  भाजून खायला घ्यायची. हळू हळू आईच्या पोळीत माझी पोळी कधी मिसळून गेली कळलंच नाही. आईने आधीच वांग्याचं भरीत, मेथीची पात्तळ भाजी, भाकरी, लसणाची चटणी, दही असा मस्त बेत करून ठेवला होता. मनसोक्त गप्पा मारत सगळे जेवलो. मला आठवलं, लहानपणी माझ्या मैत्रिणी आपापली ताटं जेवणासाहित घेऊन यायची आणि मग झक्कास अंगत पंगत, वाटावाटी व्हायची. जेवण करून मनसोक्त गप्पा मारायला सुरुवात केली आणि, चोरून खाल्लेली गारीगार, यात्रेत केलेली मज्जा, गुऱ्हाळात खाल्लेली गुळावरची साय, ताजा ताजा खरवस, अशा अनेक आठवणी निघाल्या. बोलत बोलत आम्ही शेताकडे जायला निघालो.

आता हा घरा इतकाच जिव्हाळ्याचा विषय रादर जास्तीच. देवीच्या मंदिरापाशी उभा राहिल्यावर पूर्ण शेत दिसतं.एका बाजूला लांब लांब पर्यंत धरणाचं पाणी पसरलेलं दिसतं. शेताततही तितकाच धुमाकूळ घालत होतो आम्ही. शेतात जेवण घेऊन यायचो, आंब्याच्या झाडाखाली बसून मस्त जेवायचो, आणि मग नुसता खेळ. केळीच्या बागेत खेळलेली लापाछपी, सूरपारंब्या, सगळच आठवलं. माझ्या एका मैत्रिणीवर एकदा सलग अकरा वेळेला राज्य आलं होतं. खूप धमाल आली होती. बाबांनी जोरात आरोळी दिली आणि मी धावत गेले. बाबांनी माझ्यासाठी झोका बांधलेला पाहून माझा आनंद गगनात मावेना. झोक्यावर बसले आणि मी खूप हळवी झाले. झोक्याचं आपल्याशी नातं काय असतं कोणास ठाऊक पण त्याच्यावर विश्वास ठेऊन आपण उंच उंच जाण्याचा प्रयत्न करत असतो. खेळता खेळता खूप एकरूप होऊन जातो आपण त्याच्याशी. आत्ताही मी अगदी भान हरपून खेळले. लहानपणी माझा नेहमी हट्ट असायचा मला झोका पाहिजे म्हणजे पाहिजेच. बाबांनाही ते बघून खूपच छान वाटलं. शेतात आल्यावर काय खाऊ नी, काय नाही असं झालं होतं. ऊस, बोरं, गाभुळलेली चिंच सगळं डोळ्यासमोर दिसत होतं. शेवटी झाडाची कैरी तोडली आणि फोडून खायला घेतली. आठवणी संपता संपत नव्हत्या, दिवस मात्र संपत आला होता. मंदिरात देवीपुढे दिवा लावला आणि आम्ही घरी परतत होतो. आता मात्र संध्याकाळ झाली होती. सूर्यास्ताच्या तांबूस खुणा अलगद आभाळावर उतरल्या होत्या. सगळी माणसं घराकडे निघाली होती. कोणाच्या डोक्यावर भाकरी बांधून नेलेलं टोपलं त्यात संध्याकाळच्या जेवणासाठी ताजी ताजी भाजी तर, कुणाच्या डोक्यावर सरपणाचा भारा, बैलगाडीचा आवाज, गुरांच्या गळ्यात असणार्या घुंगुरमाळांचा आवाज, मधेच गुरांचा आणि शेळ्यांचा आवाज सगळं कानावर पडत होतं. बाबांना राम राम काका, कधी आल्या ताई? असे लोकं प्रेमाने विचारत होते. गावात पोहोचल्यावर पारावर गप्पा मारत बसलेले लोकं आपुलकीने एकमेकांची दिवसभराची विचारपूस करत होते. काहींच्या घरी तेलाची चिमणी होती तर काहींच्या घरी पिवळा छोटा बल्ब. सगळ्यांची मुलं अंगणात खेळत होती. सगळं कसं मनात साठवून घ्यावंसं वाटत होतं. शेजारच्या छोट्याने त्याच्या आईला हाक मारल्यासारखा भास झाला, पण नंतर लक्षात आलं की, छोट्याने नाही तर माझी मुलगी मला हाक मारत होती. अचानक डोळे उघडले, आणि जाणवले की, मी साता समुद्रापार आहे. पण हा क्षण मला खूप सुखावून गेला. मी मुलीला जवळ घेतलं आणि तिच्याकडे बघून प्रसन्न हसले. तिला माझ्या हसण्याचं काहीच पडलेलं नव्हतं तिला समोर फक्त आंबा दिसत होता. तिने आज आंब्याचा रस कर ना आई....असा हट्ट सुरु केला आणि मीही केला मग रस, आठवणींचा कप्पा मनात तसाच ठेऊन.

      प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा हळवा कप्पा असतोच. अशा आठवणी असतातच की, ज्या कधीही आठवल्या तरी तेवढाच आनंद देऊन जातात. ज्या पुन्हा पुन्हा हव्या हव्याशा वाटतात. ज्या कायमच्या मनात घर करून राहतात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, जागा बदलली, परिस्थिती बदलली, माणसं बदलली, नाती बदलली तरी त्या जागेची आठवण, त्या माणसांची आठवण, त्या वास्तू ची ऊब, गावाच्या सान्निध्यात घालवलेला प्रत्येक क्षण, आपल्याच लोकांच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण हे सारं काही  एक चांगली आठवण म्हणून आपल्या कायम सोबत राहतं. आपलं गाव, जिथे आपण अगदी मनापसून खरेखुरे क्षण अनुभवलेले असतात ते तर आपल्यापासून कधीच वेगळे होऊ शकत नाहीत.

किती रोज धागे नव्याने विणावे
तुला आठवावे मनी साठवावे

चांदणे तुझे मी रोज पांघरावे
क्षणांचे मनोरे उरी दाटवावे

बागडले अशी मी तुझ्या अंगणी
अन, तुझेच नाते पुन्हा उलघडावे

हिंदोळ्याने तुझ्या सवे उंच उंच जावे
एकरूप होऊनी तुझेच गीत गावे

मनी तू माझ्या असा मोकळा की,
तुझे श्वास माझ्या हृद्यी जपावे

तूच किनारा तूच ठाव माझा
असा अंतरी बहरतो गाव माझा
असा अंतरी बहरतो गाव माझा......
अस्मिता कुलकर्णी

Share:

घुसमट...



ध्या ज्या गोष्टी नजरेसमोर आल्या त्याने मन अगदीच उदास झालं होतं. एक स्त्री असल्यामुळे त्याची जाणीव अगदीच तीव्र होत होती. भीती, असुरक्षितता, काळजी सगळ्या भावना एकदम जाणवत होत्या आणि मला हे सुचलं....

बोलता न येत होते शब्दाने
पण, शरीर घाव बोलत होते,
प्रतिकार होत होता वासनेला
पण, मन हतबल होत होते....

विकृतीने असे संचारले
तिथे भयानक थैमान होते,
चित्त थरारक अशा दृश्याचे
ते लज्जास्पद कोंदण होते....

जागी होईल माणुसकी
तिचा, आंधळा विश्वास होता,
तिच्या, विश्वासाचा खेळ करणारा
तो, असा एक हैवान होता....

त्याने हिसकावून घेतला
जो, मोगरा तिने वेचला होता,
ती हरत चालली तो, एक-एक क्षण
अन तो, हरूनही जिंकत होता....

मावळली आशा होती
अंधारले तिचे अस्तित्व होते,
ती थांबली जणू श्वास रोखून
अन शरीरही कोमेजत होते.

जरी, हाक ऐकू न आली कुणाला
जरी, ना कोणी कृष्ण धावूनी आला,
जरी, साथ कुणाची न त्या क्षणी तुला
तूच ऊठ, आव्हान दे त्या वादळाला....

तिच झाली स्वयंसिद्धा
तिच नवी उमेद बनली होती,
सर्वार्थाने अशी लढली ती
तिलाच ती गवसली होती.....

तिनेच फोडला टाहो शेवटी
पुन्हा एकदा केला वार होता,
एकवटला सारा जीव असा
की त्याचा डाव मोडला होता.

उघड्या डोळ्यात तिच्या
समोरच्या क्षणाची खात्री होती,
ती उठली सावरून स्वतःला
आता, तडफड संपली होती.

जरी रोजचाच होता सूर्योदय
पण, तिने नव्याने पहिला होता,
नव्यानेच ती जन्मली होती
अन श्वासही शुद्ध मोकळा होता...

स्त्रियांना निसर्गाकडून सौंदर्याचे वरदान मिळाले आहे पण हेच वरदान त्यांच्यासाठी शाप ठरतंय असं वाटतय. आजकाल सर्रास घडणाऱ्या घडामोडींमुळे मन नाराज होत चाललंय. भीती वाटते मुलगी असण्याची आणि आपल्याला एक मुलगी असण्याची. घरातून बाहेर पडायला लागल्यावर मुलींची काळजी ही एक खूप मोठी गोष्टं मनाला सारखी सतावत असते. आत्ताचा काळ एवढा निर्ढावला आहे की, कुठलातरी एक समाज तयार होत आहे की, ज्याला न कायद्याची भीती न स्वतःची लाज आणि, काहीही झालं तरी हा समाज वाढतच आहे. तेंव्हा प्रत्येक स्त्री ने मुलीने आपली काळजी स्वतःच घ्यायला हवी.

मुलगी लहान असल्यापासूनच तिच्याशी घरातल्या लोकांचा विशेषतः आईचा मोकळा संवाद हवा. आई मुलीच्या प्रत्येक गोष्टीत महत्वाची भूमिका बजावत असते. लहानपणी घेतली जाणारी काळजी, खाणं-  पिणं, राहणं अश्या अनेक नाजूक गोष्टीही ती जितक्या मोकळे पणाने आपल्या मुलीला समजावून सांगते त्याच बरोबर असाही एक समाज आपल्या आजूबाजूला आहे ह्याची देखील ओळख तिला करून देणे गरजेचे असते. तसं पाहायला गेलं तर मुलीना तो सेन्स जन्मापासूनच असतो. तिला प्रत्येक स्पर्शाची जाण  असते. फक्त ह्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघायचे हे तिला सांगायला हवे.. तिलाही आई वडिलांशी मोकळेपणाने बोलता यायला हवं. पुरुषाची नजर, स्पर्श हे विचित्र वाटत असेल तर तिला आईला वडिलांना हे सांगता यायला हवं. तसेच बाहेरच्या लोकांवर कसा आणि किती विश्वास ठेवायचा हेही त्यांना शिकवावेच लागेल. मुलींच्या पालकांची जबाबदारी दुप्पट होत चालली आहे. वेगवेगळ्या क्लासेसबरोबर कराटे, कुन्फू यांसारखे क्लासही आवश्यक आहेत जर क्लास नाही लावला तरी आई-वडिलांनीच काही सोप्प्या trics  मुलींना शिकवणे गरजेचेच आहे. मुलगी साधरण वयात आली की, ती प्रत्येक पुरुषाशी लढू शकेल, त्यांचा सामना करू शकेल एवढी धमक तिच्यात निर्माण करायला हवी. कधी कधी मुली देखील वाहवत जातात तेंव्हा चांगल्या आणि वाईट गोष्टींची जाण तिला आधीच द्यायला हवी. खरं तर कणखरता तिच्या अंगात असायला हवी.

लहान काय आणि मोठं काय आज कल स्त्री चं वय हा शून्य विषय आहे. प्रत्येकीलाच स्वतःच्या मनगटात बळ आणणे गरजेचे आहे. मुंबईच्या लोकलमध्ये फिरताना ज्या प्रकारे स्त्रिया स्व-सौरक्षणा साठी  पिना, टाचण्या, तिखटाचे पाकीट घेऊन फिरतात तसेच प्रत्येक स्त्रीने बाहेर पडताना आपल्या पर्स मध्ये ह्या गोष्टी रोज ठेवायलाच पाहिजेत. मदतीला कोणी येयील ह्याची वाट बघण्यापेक्षा मी माझे संरक्षण स्वतःच करणार असा विश्वास कायम मनात असायला हवा. समाजाला घाबरण्या पेक्षा आपण किती strong आहोत हे त्याला जाणवून द्यायला पाहिजे.
बघायला गेला तर प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हेही लक्षात घ्यायला हवं. अशा किती तरी केसेस  घडून जातात आणि त्या नजरेसमोरही येत नाहीत किंवा काही केसेस आरोप करायचा म्हणून समोर आणल्या जातात, आणि मग न्याय वगैरे, अर्थात ज्याने कृत्य केलं त्याला हमखास शिक्षा ही झालीच पाहिजे पण, त्या गोष्टी चिघळतात. राजकारण सहज आपल्या पद्धतीने ह्या गोष्टींचा पाठलाग करतं. आपण कितीही ओरडून सांगत असू तरी आपला आवाज त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. याहीपेक्षा त्यांना जे ऐकायचं असतं तेच त्यांना ऐकू येतं आणि, न्याय मिळणं कठीण होऊन बसतं.

खरं तर एक स्त्री पूर्ण घर सुधरवू शकते. आईचे आपल्या मुलांवर बारीक लक्ष हवे. त्यांनाही विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी शेअर करण्याची सवय लावायला हवी. बायकोही आपल्या नवऱ्याशी ह्या विषयावर मोकळेपणाने बोलली पाहिजे. तिच्या बोलण्यावरून खरच हा विषय किती नाजूक आहे ह्याची जाणीव प्रत्येक नवऱ्याला व्हायला हवी. एक बहिण आपल्या भावाच्या गोष्टींशी नक्कीच परिचित असते तिने त्यालाही ह्या गोष्टी किती संवेदनशील आहेत ते समजून सांगावे, मैत्रीण मित्राशी बोलताना किती comfortable असते आणि ती का असते हेही तिने त्याला जाणवून द्यायला हवे. एकंदर काय तर स्त्री पुरुषाच्या प्रत्येक नात्यात ह्या विषयावर जाणीवपूर्वक चर्चा व्हायलाच हवी की, जेणे करून प्रत्येकाला ह्या नात्यांविषयी आणि स्त्रियांविषयी आदर निर्माण होईल.

एखाद्या वेळेस अशी काही घटना घडते आणि सगळे लोकं अचानक जागे झाल्यासारखे वागतात. फक्त त्याच वेळी त्यांचं समजाशी असलेलं नातं उफाळून येतं. खूप चीड चीड होते. पुरुष असो वा स्त्री, राग अनावर होतो. मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरण्यात त्यांना शहाणपणा वाटतो जात, धर्म, राजकारण, मिडिया अगदी सगळ्यांनाच ऊत येतो आणि त्यातून काहीच हाती लागत नाही. ती घटना तिथेच थांबते. आज एका घटनेला न्याय मिळाला की सगळं संपलं, दुसऱ्या दिवसापासून समाज बदलला चांगला झाला याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. खरं तर संवेदनशील समाजाची निर्मिती ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. अर्थात ही एका कुणाची नाही तर, प्रत्येकाचीच नैतिक जबादारी आहे. जी नेहमीच प्रत्येकाने पार पाडायला हवी.

त्यामुळे समाजातील अशा विकृतीशी लढण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही सज्ज असायला हवं. आचरणात चांगल्या गोष्टी, संस्कार यांचा जाणीवपूर्वक दैनंदिन जीवनात उपयोग करावा. सामाजिक कर्तव्य म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर व्हायलाच हवा आणि, प्रत्येक स्त्रीने तो स्वतःहूनही जपावा.

अस्मिता कुलकर्णी
Share:

फोटो - साठवण एका क्षणाची...




ज उठायला जरा उशिरच झाला. खूप गडबड होती उठल्यावर सगळं आवरे पर्यंत फोनकडे बघायलाही वेळ झाला नाही. सगळं आवरून झाल्यावर फोन हातात घेतला तर बाबांचे चार मिस कॉल. पहाटे पहाटे उठून फोन केला होता बाबांनी. माझ्यासाठी पाच म्हणजे अगदीच लवकर होतं पण, बाबांची सकाळ चार वाजताच होते. थोडक्यात माझ्याकडून फोन घेणं होणारच नव्हतं, पण इतक्या लवकर का कॉल केला असावा म्हणून घाबरून घाईघाईने बाबांना फोन केला.
हॅलो म्हंटल्यावर, खूप हळवा आवाज आला खरं तर, मला जरा काळजीच वाटली. मी विचारलं, “काय झालं बाबा, सगळं ठीक आहे ना ? आई बरी आहे ना?” एवढे मिस कॉल? माझे अखंड प्रश्न सुरु झाले. “अगं हो हो काही नाही झालं आम्ही व्यवस्थित आहोत. उलट आज खूप छान वाटतंय अगदी खूप फ्रेश. “अरे वा बाबा आज काय स्पेशल ? आईने डायबेटीस विसरून मस्त काहीतरी गोड खायला केलय वाटतं." बाबाही हसले, छान वाटलं. “अगं काल तुझी खूप आठवण येत होती. मग तुझ्या लग्नाचे फोटो काढले आणि बघत बसलो होतो. मग हळू हळू जुने फोटो निघाले त्यात तुझं लहानपण आमचं लग्न, तुझे- आजी आजोबा सगळंच आलं ओघानं. खूप जुन्या गोष्टी आठवल्या खूप गप्पा मारल्या, तुझं लहानपण पुन्हा एकदा अनुभवलं. लहानपणी हट्ट करून घेतलेल्या खेळण्या, ड्रेस याच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या पहिल्यांदा जावई दाखवला होता तो देखील फोटो बघितला बरका आणि सगळं लग्न आठवलं. खरं तर खूप छान वाटलं. मला परत एकदा तरुण झाल्यासारखं वाटतंय.आज मी काहीही करू शकतो असं वाटतंय अगदी.” बाबांच्या बोलण्यावरून खरं तर गहिवरून आलं होतं. पण सावरून बाबांना गम्मत म्हणून म्हंटलं,बाबा तुम्ही तर माझे हीरोच आहात. तुम्ही तरुण झाल्यासारखं वाटतंय काय म्हणता अगदी तिशीतलेच वाटतात अजूनही मला." दोघेही मनसोक्त हसलो आणि फोन ठेवला.
ह्या संवादाने जाणीव झाली की, आपण आनंदात घालवलेले क्षण साठवून ठेवण्यासाठी “फोटो" हे माध्यम कसलं सॉल्लिड आहे. आयुष्यात आपण जेंव्हा पुढे पुढे जातो तेंव्हा मागचे अनंदाचेच क्षण आपल्याला आपल्या सुख-दुःखाच्या क्षणी, नव्याने जगण्याचे बळ देतात. हातातून निसटलेले क्षण पुन्हा जगता येत नाहीत पण पुन्हा अनुभवता नक्कीच येऊ शकतात. खरं तर हे क्षण आपल्या मनात अगदी रुजलेले असतात पण ते दृष्टीलाही दिसत असतील तर त्याची जाणीव अगदी आतून आपल्या मनातून होते. जसा आहे तसाच टिपलेला क्षण पुन्हा एकदा नव्याने जगला जातो.
पूर्वीच्या काळी एवढ्या आधुनिक गोष्टी नसल्यामुळे काही गोष्टी नक्कीच मिस झाल्या असतील पण, आपल्या आई वाडीलांसाठी तेवढेच काही फोटो आहेत जे की, त्यांनी प्रिंट काढून ठेवलेले वेगवेगळे अगदी डोळ्याच्या जवळ घेऊन बघता येणारे. ते बघून बघूनच ते पुन्हा पुन्हा तरुण होतात आणि नव्याने जगतात.खरं त्यांच्या काळातले ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो आत्ताही त्यांच्या आयुष्यात रंग भरतात.
लग्नाच्या प्रत्येक विधीचे फोटो, लहान बाळाचे रोज होणारे बदल टिपणारे फोटो, फिरायला गेल्यानंतरचे मोकळेपणा टिपणारे फोटो, घरातल्या सगळ्यांच्या नकळत काढलेला दोघांचा किंवा एकट्याचा एखादा सेल्फी, असे अनेक प्रकारे आपण हे फोटो काढत असतो. रोजच्या धावपळीच्या रुटीन मध्ये असे काहींसेच क्षण मिळतात जे आपण अगदी मनापासून जगलेले असतात. हे क्षण जर फोटोत साठवून ठेवले तर त्याची माजा काही औरच.
कोणाकोणाला फोटो काढणं फारसं आवडत नाही तर काही अगदी रोजचा रोज फोटो स्टेटस म्हणून शेअर करतात. काही सोशल साईटवर आपले फोटो शेअर करून लाईक आणि कमेन्ट ची वाट बघतात तर कोणाला ते अपल्यापुरतेच मर्यादित असलेले आवडतात. आता तर एवढी आधुनिक टेक्नॉलॉजी निघाली आहे की, तुम्हाला एखादा फोटो बघताना अगदी आपण त्या फोटोचाच एक भाग आहोत असा भास होतो. पूर्वी काढलेले फोटो कधी हरवून जात कधी खराब होत, पण आता तुम्ही ते फोटो पिढ्यांपिढ्या जपून ठेऊ शकता.काही वेळा आधुनिकतेचा दुरुपयोगही होत आहे पण चांगल्या गोष्टींसाठी याचा उपयोग झाला तर दुधात साखरच.
अर्थात प्रत्येकानेच आधुनिक गोष्टी वापराव्यात असं नाही पण प्रत्येकाने आपापल्या परीने फोटो मात्र नक्की काढावेत. काही काही दिवसांनी घरातल्यांनी, मित्रमंडळींनी मिळून ते क्षण पून्हा एकदा एकत्र भरभरून जगावे.
श्राव्याच्या पहिल्या वाढदिवसाला आम्हीही तिचे बोळके हास्य असलेल्या फोटोंचे एक कोलाज तयार केले होते. ते तयार करत असताना देखील आम्ही तिचं एक वर्ष जसं च्या तसं अनुभवलं. आता श्राव्या चार वर्षाची झाली आहे. ते कोलाज अजूनही भिंतीवर फ्रेम करून लावले आहे. रोज त्याच्याकडे बघितलं की, सगळे जुने छान क्षण आठवतात खूप छान, प्रसन्न आणि मोकळं वाटतं. श्राव्यालाही त्या कोलाजमध्ये असलेल्या फोटो मागे घडलेल्या गोष्टी ऐकायला खूप आवडते आणि मग आमच्या तिघांचा दहा मीनिटांचा असला तरी एकमेकांना क्वालिटी टाइम दिला जातो..
त्यामुळे नक्की फोटो काढत जा, फोटो काढता क्षणी आणि फोटो पाहिल्यानंतर मनापासून हसत जा..


अस्मिता कुलकर्णी

Share:

लोकप्रिय लेख

Followers

वाचकांची संख्या