‘लहानपण देगा देवा’ हे वारंवार वाटत असलेलं स्वतःचं मन
अचानक कधी मोठेपणाकडे, सामंजस्याकडे वळतं समजतच
नाही. सगळ्या गोष्टींचे, घडणाऱ्या घडामोडींचे अर्थ लहानपणी आपल्याच विचारानुसार
घेतले जातात. त्या विचारांची धाव कितपत असणार याचा अंदाज येतोच. तो अल्लडपणा,
निरागसपणा, खेळकरपणा सारं काही अगदी वेगळंच.. हेवेदावे, अपेक्षा, दडपण ह्या आणि अशा
प्रकारच्या गोष्टींना तेंव्हा लहानश्या मनात कुठेच जागा नसते. आपल्या आजूबाजूला,
घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी छानच आहेत याच आनंदात राहून आपण आपल्याच विश्वात
खूष असतो. त्यामुळे आपल्या भोवती एक सकारत्मक भावना निर्माण होते. स्वतःभोवती
चांगले कुंपण तयार होते. समोर येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद आपल्यात
ह्या सकारात्मक्तेमुळे आपोआपच तयार होते. आणि आपण आपल्याच नकळत मोठे व्हायला
लागतो. लहानपणीच्या त्याच गोष्टींचा विचार हळू हळू वेगळ्या दृष्टीकोनातून करायला
लागतो. कधी कधी लहानपणी केलेल्या विचारांवर हसूही येते, कधी वेडेपणाही वाटतो. पण
ती सकारात्मकता मात्र तशीच असते.त्यामुळे दृष्टीकोन वेगळा असला तरी, विचार चांगलाच
असतो..आणि असाच आपला स्वभाव बनत जातो. लहानपणापासूनच आपण एक चांगली व्यक्ती कसे होऊ
शकतो यासाठी आपल्या घरचे आपल्याला कळायला लागल्यापासून आपणही प्रयत्न करतच असतो.
थोडक्यात काय तर लहानपण हे सुद्धा आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वासाठी खूप महत्वाचा
टप्पा असतो.
छुम छुम पैंजण वाजवत
पहिला पाऊल टाकायला सुरुवात केलेल्या त्याच घरात आता पाय वाजवून चालायलाही नको
वाटतं, सगळ्यांच्या मागे लागून, हट्ट करून, रडून चॉकलेट्स, बिस्किटं खाणारे आपण
स्वतःहून घरातल्या लहानांना ते देतो. लहानपणी आपल्याला आपले डोके चोळून झोपवणाऱ्या
आपल्या आई बाबांचे पाय आता तेलाने चोळून देऊन त्यांना कशी शांत झोप लागेल याची
काळजी आपलं मन घेतं. कायम सोनुली, पिल्ला, राजा असे शब्द लहनपणी ऐकून अपोआप आपल्या बोलण्यातही जवळीकपणा आणि आदर दिसायला लागतो. चांदोबा,
इसापनीती वाचता वाचता जाडी भरडी पुस्तकंही आता सहज वाचली जातात. फरक इतकाच की,
लहानपणी आई बाबा वाचून दाखवत आणि आता चार गोष्टी आपण त्यांना पटवून देतो. इतकी
सहजता आपल्या आयुष्यात येते ती म्हणजे त्या लहानपणी आपल्या भोवती तयार झालेल्या
चांगल्या सकारत्मक संस्काराच्या कुंपणामुळेच. जे कुंपण आपल्यात सारं काही सामावून
घेऊ पहातं, आणि आपल्या अनुभवानुसार स्वतःची मर्यादा वाढवतं.
आता तर आयुष्याचा
महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे “लग्न” मुलींच्या बाबतीत घर बदलतं, माणसं बदलतात,
पद्धतीही बदलतात तडजोडीचा भाग मुली काय आणि मुलं काय प्रत्येकाच्या आयुष्यात
थोड्या फार फरकाने येतच असतो. ह्या परिस्थितीला कधी कधी समजावून घेणं उमजत नसलं
तरी, चांगलं काहीतरी घडावं,
चांगलच व्हावं असा अट्टहास मनात घट्ट पाय रोवून उभा असतो. हेही सगळं त्या
स्वतःभोवतीच्या चांगल्या कुंपणामुळे.
आता आपलंच बालपण
नव्याने अनुभवण्याची संधी आपल्याला मिळते. पहिल्यांदा आनंदाची बातमी समजल्यावर मनात
अगदीच धस्स होतं. काळजी, आनंद, उत्साह सगळं एकदम मनात दाटतं. आपण आपल्या आईच्या
पोटात असतानाच्या नऊ महिन्यांसाहित जे काही चांगलं आणि सकारात्मक तिने आपल्याला
अनुभवून दिलं तसच आपल्या बाळालाही मिळावं याची जबाबदारी आता आपल्यावर असते.
अप्रत्यक्षपणे का असेना पण त्याला सगळं जाणवत असतं. त्यामुळे सतत प्रसन्न, आनंदी,
हसतमुख राहणं अतिशय महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकारात्मक वातावरण
त्याच्या आजूबाजूला असणे हे आपले कर्तव्य असते. जो पर्यंत त्याच्यामध्ये स्वतः
स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होत नाही तोपर्यंत आपली जबाबदारी दुप्पट
असते. जे जे काही छान अनुभव आपण लहनपणी घेतले ते त्यानेही अनुभवावं. त्यानेही त्याच सकारात्मकतेने, जिद्दीने पुढे जावं आणि जे
काही चांगलं असेल ते सामावून घेणाऱ्या कुंपणाची कायम सोबत ठेवावी, याची जबाबदारी
आपल्यावर असते आणि ती आपण सहज पेलवून नेतो.
हे आणि
आयुष्यातल्या बर्याच छोट्या मोठ्या गोष्टी ह्या चांगल्या कुंपणामुळे सहज फुलतात.
फक्त चांगले, स्वच्छ विचार, बोलण्यात गोडवा आणि मनात सकारात्मकता हवी...





